@maharashtracity
धुळे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणार्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने स्वप्नील लोणकरने वयाच्या चोविसाव्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेसंदर्भात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने धुळ्यात निदर्शेने करीत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे दोन वर्षांपूर्वी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील स्वप्निलसारख्या अनेक विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी मिळाली नाही. काही महिन्यापूर्वीच एमपीएससीच्या विषयाला घेऊन पुण्यासह संपूर्ण राज्यात आंदोलन झाले. परंतु, या आंदोलननंतरदेखील राज्य शासन स्पर्धापरीक्षा देणार्या उमेदवारांबाबत गंभीर नाही हे या घटनेवरून लक्षात येते.
स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला राज्य शासन पूर्णत जबाबदार आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे उच्चशिक्षित स्वप्नील लोणकर यांचा बळी घेतला आहे, असे मत अभाविप धुळे शहर मंत्री भावेश भदाणे यांनी व्यक्त केले. अभाविप स्वप्निल लोणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते व त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती व्यक्त करते. स्वप्नील लोणकरसारखी वेळ अन्य उमेदवारावर येऊ नये यासाठी शासनाने त्वरित अन्य उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना नोकरीवर रुजू करावे, असे देखील भदाणे म्हणाले.
यावेळी अभाविप धुळे शहर मंत्री भावेश भदाने, आदिती कुलकर्णी, वैष्णवी मराठे, आदिनाथ कोठावदे, निशांत शिंदे अनुज वाघ, चेतन अहिरराव उपस्थित होते.