@maharashtracity

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेल्या तुळशी तलावांत या पावसाळ्यात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ पर्यंत या तलावांत ८३ टक्के म्हणजे ६ हजार ६८६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. या तलावाची पूर्ण क्षमता ८ हजार ४६ दशलक्ष लिटर इतकी आहे.

गेल्या २४ तासात मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई बाहेरील पाच तलावांत अत्यंत कमी पाऊस पडला आहे. मात्र, मुंबईतील भांडुप संकुल परिसरातील तुळशी तलावांत (Tulsi lake) ६० मिमी इतका तर नजीकच्या विहार तलावांत (Vihar lake) ६३ मिमी इतका पाऊस पडला आहे. याच प्रमाणात या तलाव परिसरात पाऊस पडल्यास प्रथम तुळशी तर नंतर विहार तलावही जलदगतीने भरून वाहू लागेल.

गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने २७ जुलै रोजी तुळशी तलाव भरून वाहू लागला होता. यंदाच्या पावसाळ्यात पवई तलाव क्षेत्रात प्रारंभीच चांगला पाऊस पडल्याने हा तलाव १२ जून रोजी भरून वाहू लागला. मात्र या तलावातील पाणी क्षारयुक्त असल्याने ते पिण्यासाठी वापरले जात नाही. तरीही पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी त्या तलावातील पाण्याचा वापर करण्यात येतो.

यंदा पावसाळ्याचा दीड महिना उलटत आला तरी तुळशी, विहार तलाव वगळता मुंबई बाहेरील पाच तलावांच्या परिसरात समाधानकारक पाऊस पडलेला नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख ५० हजार ५१८ दशलक्ष लिटर पाणीसाठा (१७.३१ टक्के) जमा झालेला आहे. मुंबईला दररोज ३ हजार ८५०दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील एकूण पाणीसाठा व दैनंदिन पुरवठा यांचे गणित केल्यास सदर पाणीसाठा पुढील ६५ दिवस पुरेल इतका म्हणजे १५ सप्टेंबरपर्यन्त पुरेल इतका आहे.

तलावातील पाणीसाठा, पावसाची नोंद

तलाव पाणीसाठा क्षमता
(द.श.ल.लि.) ( द.श.ल.लि.)
अप्पर ० २,२७,०४७
वैतरणा

मोडकसागर ३५,४४० १,२८,९२५

तानसा ४४,२४४ १,४५,०८०

मध्य वैतरणा १९,९०४ १,९३,५३०

भातसा १,२५,९३० ७,१७,०३७

विहार १८,३१३ २७,६९८

तुळशी ६,६८६ ८,०४६

एकूण
पाणीसाठा -:२,५०,५१८ १४,४७,३६३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here