By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीकडून सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. 

बावनकुळे म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल काळात हजारो कार्यकर्त्यांनी जनसंघ आणि त्यानंतर भाजपाची विचारधारा रुजविण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागावरच आज पक्ष उभा आहे. पक्षाची स्थापना करताना अटलबिहारी वाजपेयी यांनी समृद्ध, विकसित, बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते.आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलजींनी पाहिलेले सर्वश्रेष्ठ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. त्यामुळेच भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.

यापुढील काळात राज्यात पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेल्या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करून मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारची विकास कामे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविली पाहिजेत. ३ कोटी नवे सदस्य बनविण्याचे अभियान यशस्वी करण्याचा आणि शिवसेना युतीसह लोकसभेच्या सर्व ४८ जागा, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी स्थापना दिनाच्या निमित्ताने केला पाहिजे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

यावेळी बावनकुळे यांच्या हस्ते जनसंघापासून काम केलेल्या राम नाईक, मुकुंदराव कुलकर्णी, मधू चव्हाण,bकांताताई नलावडे, दिलीप गोडांबे, कर्नल चौधरी, कर्नल देशपांडे, अनंत मराठे, शैला पतंगे- सामंत, दिलीप हजारे, भरत कारंडे, श्रीपाद मुसळे, बाबा कुलकर्णी आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्याआधी बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.पक्षाच्या आयुष्मान भारत सेल तर्फे आयोजित आयुष्मान भारत कार्ड वितरण कार्यक्रमाचा प्रारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here