By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: अन्याय अत्याचारांचा मुकाबला करणाऱ्या दलित पँथर या आक्रमक संघटनेचे पुनर्जिवन करण्याचा आपण विचार करीत आहोत. आजची तरुण पिढी केवळ व्हॉटसअप, फेसबुकवर आपला राग व्यक्त करते आहे. या नव्या पिढीला पुन्हा सामाजिक क्रांतीच्या आंदोलनात उभे करण्यासाठी नव्या पिढीच्या हाती दलित पॅंथरचे संघटन देण्याचा आपण विचार करीत आहोत. रिपब्लिकन पक्षाशी संलग्न असणाऱ्या आणि सामाजिक संघटना म्हणुन दलित पँथरचे पुर्नजिवन करण्याचा आपण विचार करीत आहोत, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

नागपुर येथे दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त आयोजित सोहळ्यामध्ये ते बोलत होते. दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी भुपेश थुलकर होते तर अर्जुन डांगळे, दिलीप जगताप, रिपाइंचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, दिवाकर शेजवळ, दयाळ बहादूर, विजय आगलावे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, सूत्रसंचालन राजन वाघमारे यांनी केले.

आठवले म्हणाले, जो तो उठतो आणि राष्ट्रीय नेता बनतो. समाजातील प्रत्येक नेत्याला अखिल भारतीय नेता बनायचे असते. त्यामुळे आपले पक्ष, संघटना एकसंघ राहत नाहीत. आंबेडकरी समाजाला फुटीचा शाप आहे, त्यामुळे आपली राजकीय आर्थीक प्रगती होत नाही. दलित पँथरची स्थापना १९७२ रोजी झाली. पँथरमुळे रिपब्लिकन पक्षाला, आंबेडकरी चळवळीला बळ मिळाले. परंतु राजा ढाले आणि नामदेवराव ढसाळ यांच्यात वाद झाला आणि पँथर १९७४ ला फुटली. दलित पँथरची फुट दलित चळवळीसाठी धक्का होता. भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना नागपुरात ३ ऑक्टोबर १९५७ साली झाली. वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्राच्या आधारे पक्ष स्थापन होणे अपेक्षित होते. सर्व जातीधर्माचा हा पक्ष असावा आणि तो सत्ताधारी झाला पाहिजे, अशी इच्छा बाबासाहेबांची होती. पण समाजाला फुटीचा शाप आहे. पक्षाची घटना काय असावी यावरून वाद निर्माण झाला आणि एका वर्षात पक्षात फुट पडली. आता आरपीआयमधील सर्व गट एकत्र यावे, अशी समाजाच्या लोकांची भूमिका आहे. त्यावर आणि दलित पँथर ही चळवळ पुन्हा उभी राहू शकते काय, यावर विचार झाला पाहिजे, असेही ना.रामदास आठवले म्हणाले.

सध्याची पिढी ही केवळ सोशल मिडीयाद्वारे निषेध व्यक्त करते. रस्त्यावर उतरुन आता कोणीही आंदोलन करीत नाही. आम्ही दलित पँथरच्या काळात रस्त्यावर उतरुन आंदोलने केलीत. दलित पँथर ही राजा ढाले आणि जे.व्ही पवार यांनी बरखास्त केल्यानंतर भारतीय दलित पँथरच्या रुपाने जिवंत ठेवण्याचे काम हे रामदास आठवले यांनी केले होते. रामदास आठवले यांनीच दोन पिढया दलित पँथरमधील युवकांना पँथर म्हणुन घडविले, असे यावेळी अनेक वक्त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here