@maharashtracity
मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाला अदानी ग्रुपने आपले नाव
दिले त्याला शिवसेनेने विरोध दर्शवला. भाजप गप्प बसली. मात्र मुंबईत २० वर्षांपूर्वी दोन ठिकाणी रस्त्याला टिपू सुलतानचे नाव दिले असताना आता त्या संदर्भात मंजूर प्रस्तावाचा फेरविचार करण्याची मागणी करून भाजप दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.
समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी, जानेवारी २०२१ मध्ये मानखुर्द येथील उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर पालिका प्रशासनाने त्यावर सकारत्मक अभिप्राय दिला. मात्र भाजपने त्यास विरोध दर्शवला.
२० वर्षांपूर्वी अंधेरी भवन्स कॉलेज येथील शेर ए म्हैसूर टिपू सुलतान मार्ग तसेच गोवंडी येथील शहीद टिपू सुलतान मार्ग असे नाव देण्यात आले आहे. टिपू सुलतान असे नाव दिलेल्या मुंबईतील या दोन रस्त्यांच्या नावावर आक्षेप घेऊन भाजपने यासंदर्भातील विषय फेरविचार्थ आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुंबईतील विमानतळाला आपले नाव देणाऱ्या अदानीच्या प्रकरणी भाजप गप्प बसली आहे. त्यामुळे भाजपची ही दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे.
त्यामुळे आता शिवसेना व भाजप यांच्यात पुन्हा एकदा टिपू सुलतानच्या नावावरून मतभेद उफाळून येणार आहेत.