@maharashtracity
By अदिती अभंग
अमळनेर: छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व समाज घटकांना शिक्षणाची संधी दिली. सक्तीचे व मोफत शिक्षण देऊन त्यांच्या शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालये स्थापन करून विद्यार्थ्यांना वसतिगृह व राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली व शिक्षणाच्या माध्यमातून एक शैक्षणिक क्रांती केली, असे मनोगत ऍड. ललिता पाटील यांनी निर्णायक एल्गारच्या वतीने छत्रपती शाहू महाराज डिजिटल जयंती महोत्सवात व्यक्त केले.
ऍड. ललिता पाटील यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, संयमी व आक्रमकपणे आपले विचार मांडताना छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करताना त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आपण केले पाहिजे, असे आवाहन केले.
आजही आरक्षणासाठी रस्त्यावर चक्काजाम करावा लागत असेल तर राज्यकर्त्यांनी नेमके काय काम केले ? असा प्रश्न उपस्थित करून ऍड पाटील म्हणाल्या, “सर्व पुढाऱ्यांनी केवळ छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा जयजयकार केला. पण त्यांचे कार्य व विचार कुठे दिसत नाही. छत्रपती शाहू महाराज यांनी जे शैक्षणिक कार्य केले त्यांचा शैक्षणिक वसा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चालू ठेवून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे झाड लावले, त्याला फुले व फळे आली आहे.”
“मी ललित पाटील एक छोटीसी माझी जिजाऊ बहुउद्देशीय संस्था अमळनेर येथे शैक्षणिक संस्था आहे व त्या शैक्षणिक संस्थेतून मी शिक्षणाचे काम करीत आहे. पण यावर्षी कोरोनासारखी महामारी आली. पालकांना व विध्यार्थ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले म्हणून विद्यार्थ्यांची ३००० रुपये फी माफ केली. देता आली तर द्या. परंतु सक्ती नाही हेच छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य आहे,” असे ऍड ललिता पाटील यांनी सांगितले.
ऍड ललिता पाटील यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याचा संपूर्ण आढावा घेऊन आपण सर्वजण छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितलेल्या मार्गाने मार्गक्रमण करू या व हीच खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती असेल, असे सांगितले.