प्रदेश काँग्रेसची मागणी

By Anant Nalavade

Twitter: @NalavadeAnant

मुंबई: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग मोठा गाजावाजा करुन ईडी सरकारने घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते खुला केला. हा महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघात होत आहेत. या महामार्गाबद्दल अनेक तक्रारीसुद्धा येत आहेत. पण शिंदे फडणवीस सरकार त्याची दखल घेताना दिसत नाही. त्याची परिणीती बुलढाण्याजवळ खाजगी बसला अपघात होऊन २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला, हा अपघात नसून सरकारी अनास्थेचे बळी आहेत. म्हणून शिंदे फडणवीस सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी येथे केली.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन २६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे. अपघातातील मृत्यांना श्रद्धांजली अर्पण करुन पटोले यांनी ईडी सरकारवर तोफ डागली.

ते पुढे म्हणाले की, या महामार्गासाठी तब्बल ५४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आपण मोठे दिव्य काम केल्याचा डांगोरा हे सरकार पिटत असते. पण हा महामार्ग खुला झाल्यापासून मागील सहा महिन्यात या महामार्गावर जवळपास ३०० अपघात झाले आहेत. प्रत्येक अपघातात कोणाचा ना कोणाचा मृत्यू होत आहे. आजचा अपघात तर अत्यंत भीषण होता. २६ जणांचा मृत्यू होतो यातूनच या अपघाताची तीव्रता किती भीषण आहे हे दिसून येते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

समृद्धी महागामार्गातून काही मोजक्या लोकांचीच समृद्धी झाली आणि महामार्ग मात्र मृत्युचा सापळा बनला आहे. या महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने अजून खूप करावे लागणार आहे. या महामार्गावरील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. सरकारने या रस्त्याचे विशेष ऑडीट केले पाहिजे तरच असे दुर्दैवी बळी जाणार नाहीत पण सरकारला फक्त जाहीरातबाजी करुन श्रेय लाटण्यातच धन्यता वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.

समृद्धी महामार्गाच्या आराखड्यासाठी सुद्धा तज्ञांच्या विशेष पथकाला हजारो कोटी रुपये दिले आहेत. पण अपघाताचे प्रमाण पाहता रस्ते बांधणी करताना फारशी काळजी घेतल्याचे दिसत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणि एक्स्प्रेस वे साठी निश्चित केलेले नियम पाळलेले दिसत नाहीत. रोड हिप्नॅासीस मुळे अपघात होतात असे काही काही तज्ञांनी सांगितले आहे. मात्र त्यावर काहीही उपाय केलेले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

रस्त्यावर ठरावीक अंतरावर चहा पाणी जेवण मिळणारे हॅाटेल आणि स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. याचा त्रास वाहनचालकांना आणि प्रवाशांना होतो. तसेच रोड हिप्नॅासीसच्या घटनांमध्ये वाढ होत असून या महामार्गावरील अपघात इतर महामार्गापेक्षा कमी आहेत, अशा पद्धतीचा दावा सरकार करत असते, पण हे सर्व चुकीचे असून मुळात ईडी सरकार आपल्या चुका मान्यच करत नाही. १२ तासात नागपूर ते मुंबई पोहचू शकतो असा महामार्ग आपण बनवला यातच ते मग्न आहेत. आतातरी सरकारने डोळे उघडावेत व समृद्धी महामार्गावरचे अपघात होऊ नयेत यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना कराव्यात. पावसाळी अधिवेशनात आम्ही सरकारला या प्रश्नी जाब विचारणार आहोतच. पण ईडी सरकार आजच्या अपघातातून काही बोध घ्यावा तात्काळ उपाय करावेत, अशी मागणीही पटोले यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here