30 हजार रोजगार निर्मिती, 13,500 मे.वॅ.साठी करार
Twitter : @maharashtracity
मुंबई: राज्यात उदंचन (पम्पिंग स्टोरेज) जलविद्युत प्रकल्पासंदर्भात आज 71 हजार कोटी रुपयांचे करार करण्यात आले. यात नॅशनल हायड्रो पॉवर कार्पोरेशनच्या माध्यमातून 44,000 कोटी रुपयांचे 7350 मेवॅ. क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार असून, खाजगी टोरंट पॉवर लि. कंपनीच्या माध्यमातून 5700 मेवॅ. क्षमतेचे प्रकल्प, 27,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह उभारण्यात येणार आहेत. नॅशनल हायड्रोचे प्रकल्प सावित्री (2250 मेवॅ), काळू (1150 मेवॅ), केंगाडी (1550 मेवॅ.), जालोंद (2400 मेवॅ.), तर टोरंटचे कर्जत (3000 मे.वॅ.), मावळ (1200 मे.वॅ.), जुन्नर (1500 मेवॅ.) येथे प्रकल्प असतील. एकूण 30 हजार रोजगार यातून निर्माण होणार असून, एकूण गुंतवणूक ही 71 हजार कोटी रुपये इतकी असणार आहे.
हे प्रकल्प नवीनीकरणीय उर्जेचा भाग असून, जागतिक स्तरावर आता अपारंपारिक ऊर्जा निर्मितीकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. केंद्र सरकारचा सुद्धा यासाठी आग्रह आहे. खालच्या जलाशयातून पाणी सौर उर्जेतून उचलले जाते. रात्रीच्या वेळी तेच पाणी खालच्या स्तरामध्ये आणले जाते आणि यातून पपिंग मोडद्वारे वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात येते. अपांरपारिक उर्जेच्या क्षेत्रात हे करार असून एवढी गुंतवणूक अन्य कुठल्याही राज्यात आलेली नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, कालच एफडीआयची आकडेवारी आली. महाविकास आघाडीच्या काळात कधी कर्नाटक तर कधी गुजरात क्रमांक एकवर होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राला क्रमांक 1 चे राज्य करु, हे आम्ही आधीपासून सांगत होतो. आता आलेल्या ताज्या आकडेवारीतून महाराष्ट्र पुन्हा क्रमांक एकचे राज्य बनले आहे. उद्योग बाहेर गेले असे म्हणणार्यांनी आता तोंडं बंद केली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.