भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला सत्ता गेल्यामुळे घरघर लागली असून लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांआधी मोठा भाऊ कोण याचे दावे सुरु झाल्याने महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे सुरु झाल्याची बोचरी टीका भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली. भाजपा प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते.

उपाध्ये यांनी सांगितले की, केवळ सत्तेसाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. सत्ता गेल्यानंतर या पक्षांमध्ये कलगी तुरा रंगला आहे. ‘राष्ट्रवादी’ ने आघाडीत आपणच मोठा भाऊ असल्याचा दावा केला आहे, तरं अधिकृत पक्षच नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष उद्धवराव ठाकरे आपल्यामागे किती माणसे आहेत हे न मोजताच लोकसभेच्या १९ जागांवर दावा करू लागले आहेत. कोणत्या आधारावर आपण १९ जागा मागत आहोत हे संजय राऊत यांनी सांगावे, असेही उपाध्ये यांनी यावेळी नमूद केले.  

सत्तेतून गेल्यावर जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी कोणाची ताकद जास्त हे सांगण्यातच आघाडीचे तिन्ही पक्ष आपली ताकद खर्च करत आहेत. एकमेकांच्या आधाराशिवाय आपण टिकू शकत नाही हे या तिन्ही  पक्षांना ठाऊक असतानाही केवळ जिवंत राहण्यासाठी एकमेकांमध्येच यांची स्पर्धा सुरु झाल्याने या आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे चालू आहे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

उपाध्ये यांनी सांगितले की, पूर्वी एखाद्या सरकारी यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले की, राजकीय नेत्यांना त्याचा गवगवा होऊ नये असे वाटायचे. आता मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला जाताना आपण मोठे शौर्य केल्याचा आविर्भाव आणलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकताच यातून स्पष्ट झाल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here