प्रदेश भाजपची मागणी

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: समान नागरी कायदा (Common Civil Code) अति तातडीने लागू झाला पाहिजे. भाजपचीही हीच भूमिका असून, प्रत्येक धर्म व समाजाच्या नागरिकाला सारखा अधिकार असावा, महाराष्ट्राच्या मनातील इच्छा आहे, असे स्पष्ट करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. जी आश्वासने दिली त्यांची पूर्तता होईल.

२२ व्या विधि आयोगाने समान नागरी कायद्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करून ते म्हणाले, की संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. आता सुरू झालेली प्रक्रिया देशाच्या हितासाठी गरजेची आहे. ३७० कलम हटविणे (Article 370), अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणे (Ram Mandir) आणि समान नागरी कायद्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटविले आहे. राम मंदिराचे बांधकाम वेगात सुरू आहे.

गृहखाते व फडणवीस यांच्या बदनामीचा कट

विरोधी पक्षांकडून काही प्रकरणे तयार करून राज्याच्या गृहखात्याला व देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis)  यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत. ती कारस्थाने कशी तयार केली जातात याचा अंदाज आजच्या संजय राऊत धमकी प्रकरणावरून लक्षात येते. शरद पवार यांनी भाजपा आणि युती सरकारच्या काळात ख्रिश्चन आणि मुस्लिमांना धोका असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर संभाजीनगर येथे प्रकरण झाले, बंटी पाटील यांच्या वक्तव्यानंतर कोल्हापुरात दंगली झाल्या. एक नॅरेटीव्ह सेट केला जात आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्त्वात राज्यातील गृहखाते उत्तम काम करीत आहे, असा दावा ही बावनकुळे यांनी केला.

अधिकार केंद्रीय संसदीय बोर्डाला

भाजपा-सेना युतीमध्ये कोण लढणार हे ठरविण्याचा अधिकार केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे समन्वय करतील. स्थानिकांना काहीच ठरविण्याचा अधिकार नाही. भाजपा – सेना युती विचारांची आहे, त्यामुळे ती एकत्र राहणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे. ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. तिन्ही पक्षांचा विचार वेगळा आहे. तेथे तीन तिघाडा काम बिघाडा होणारच असल्याचा दावा ही त्यांनी यावेळी केला.

शिंदे-फडणवीस प्रगल्भ नेते

एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते विचाराने प्रगल्भ आहेत. सत्तेकरिता एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर यावा यासाठी काम करीत आहेत. भाजपा – सेना युती घट्ट आहे. राज्यातील १३ कोटी जनतेने हे सरकार मान्य केले आहे. कुणी जाहिराती दिल्या, बॅनर, पोस्टर लावले तरी काहीच फरक पडत नाही. भाजपाच्या सदस्यांना पोस्टरबाजी करू नये अशा सूचना दिल्या आहेत. मोदी@9 अभियानातंर्गत भाजपा राज्यभर विविध कार्यक्रम राबवित आहे. त्यातून आम्ही जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

आशीष देशमुख यांचा रविवारी प्रवेश

भाजपाचा कोणताही कार्यकर्ता अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाही. बाकीच्या पक्षाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. रविवारी १८ तारखेला कॉंग्रेसचे नेते आशीष देशमुख हे देवेंद्र फडणवीस  यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपात पक्षप्रवेश वाढले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुका आम्ही जिंकू असाही दावा त्यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here