By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: सावरकर हे देशाचे दैवत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी यातना सहन केल्या. तरीही काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अवमान का करतात. आजही त्यांनी सावरकरांचा अवमान केला. याबद्दल राहुल गांधी यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. क्षमा मागायला मी सावरकर नाही, असे म्हणणारे ते सावरकरांना काय समजतात? असा संतप्त सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना राहुल गांधी यांचा निषेध केला.

एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, विरोधकांनी आज उत्तर न ऐकताच सभागृहातून पळ काढला. काही लोक सभागृहाबाहेर स्टंट करण्यात मश्गुल आहेत. त्यांच्यात उत्तर ऐकण्याचे धाडस नाही. राहुल गांधी यांनी मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केले.त्याबद्दल त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली. त्याची कार्यवाही लोकसभा कार्यालयाने केली. अजूनही ते तशी वक्तव्ये करत आहेत. महाराष्ट्रातील जनता हे विसरणार नाही, त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा देतानाच राहुल गांधी यांनी सेल्युलर कारागृहात राहून दाखवावे, असे आव्हानही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ज्या कायद्यामुळे राहुल गांधी निलंबित झाले, तो कायदा माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते मनमोहनसिंग यांच्याच कार्यकाळात झाला आहे, याकडे लक्ष वेधतानाच त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय? असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

ते म्हणाले, हे खर्‍या अर्थाने गतिमान सरकार आहे. या अधिवेशनात विक्रमी कामकाज झाले. पंचामृत योजनेमुळे आपण प्रत्येक घटकापर्यंत पोचलो. मेट्रोची योजना पुढे आणली. महिलांसाठी एस्.टी.मध्ये ५० टक्के सवलत दिली. त्याचा सात दिवसांत अध्यादेश काढला. यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. आनंदाचा शिधा हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत देणार आहोत. आज बळीराजावर संकट आलेले आहे. मात्र, हे सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. अडचणीच्या काळात त्यांच्यासाठी मागे पुढे पाहाणार नाही. ५० हजार रुपयांपर्यंत हानी भरपाई शेतकर्‍यांना देत आहोत. कुणाची खासगी मालमत्ता किंवा प्रायव्हेट लिमिटेड आस्थापनाप्रमाणे आपले सरकार काम करत नाही, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उत्तर देताना लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here