@maharashtracity
मुंबईतील प्रदुषणाची पातळी चिंतेत भर टाकणारी
मुंबई: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील प्रदुषणाची पातळी चिंता वाढवणारी ठरली (rise in noise pollution in Mumbai) असून आवाज फाउंडेशनने (Awaaz Foundation) काही दिवसांपूर्वी केलेल्या फटाक्यांच्या चाचणीत अनेक फटाक्यांनी आवाजाची पातळी ओलांडल्याचे समोर आले.
हरित फटाक्यांमध्ये (Green crackers) कायद्याने प्रतिबंधित केलेले विषारी रासायनिक धातूंचा (hazardous chemical) वापर केल्याचे ही स्पष्ट झाले. तसेच बंदी घातलेले फटाके देखील सर्रासपणे विक्रीस उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यावरण पुरक दिवाळी साजरी करा असा सल्ला आवाज फाऊंडेशनकडून देण्यात आला आहे.
आवाजाची पातळी तसेच प्रदुषणाची पातळी वाढू नये म्हणून नेमून दिलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. परिणामी प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचे दिसते. बुधवारी मुंबईतील (Mumbai) हवा गुणवत्ता निर्देशांक हा २६६ सह वाईट नोंदवला गेला. तर कुलाबा ३४६, माझगाव ३५६, बीकेसी ३१३ हवा गुणवत्ता निर्देशांकासह अतिशय वाईट स्तर नोंदवला गेला.
मालाड २५९,चेंबूर २५२ हवा गुणवत्ता निर्देशांकासह वाईट स्तर नोंदवला गेला. नवी मुंबई १६६,अंधेरी १८३, बोरिवली १६२,वरळी १४२,भांडुप ११५ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम नोंदवला गेला.
दिवाळीमध्ये (Diwali) फटाक्यांचा वापर अधिक झाला तर मात्र प्रदूषणाची पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आवाज फाऊंडेशनच्या प्रमुख सुमैरा अब्दुलली (Sumaira Abdulali) यांनी सांगितले की, बंदी घातलेल्या फटाक्यांची खुलेआम विक्री होत आहे. अशा फटाक्यांमुळेच प्रदूषणाची पातळी वाढताना दिसत आहे. यंत्रणेकडे तशी तक्रार केली असून कारवाईची मागणी करण्यात आली असल्याचे सुमैरा यांनी सांगितले.