विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टिका
Twitter: @maharashtracity
मुंबई: राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचे भान नसणारा अर्थसंकल्प असल्याची खरपूस टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचा अर्थसंकल्प कसा लिहावा हेच माहित नसल्याने ते कमी पडले. या सरकारच्या अर्थसंकल्पात निव्वळ शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा सुकाळ असून राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने यातील किती गोष्टींची फलश्रृती होईल याबाबत शंकाच आहे. देवेंद्रजींच्या रुपाने एक अभ्यासू अर्थमंत्री मिळाला असे वाटत असताना पुस्तक लिहिणे आणि खराखुरा अर्थसंकल्प लिहिणे यात खूप फरक असल्याचा टोला अजित पवार यांनी यावेळी हाणला.
पवार म्हणाले, राज्याचा आर्थिक पाहणी अहवालाचा अभ्यास केला असता राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. ही चिंतेची बाब असून दरडोई उत्पन्नात सुध्दा महाराष्ट्र खाली गेला आहे. महाविकास आघाडीच्या काळात अर्थमंत्री या नात्याने राज्याला दीर्घकालीन शाश्वत विकासाच्या वाटेवर नेणारे अर्थसंकल्प मांडले होते. मात्र मागच्या सरकारच्या अनेक योजना या सरकारने बंद केल्या. तसेच अनेक योजनांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे आजअखेर राज्याच्या अर्थसंकल्पातील योजनेवर फक्त ५२ टक्के निधी खर्च झाला आहे. हे वित्तीय वर्ष संपायला अवघे काही दिवस राहिलेले असताना एवढा निधी अखर्चित राहणे ही राज्याच्या विकासाच्यादृष्टीने योग्य बाब नसल्याचे पवार म्हणाले. तसेच गेल्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी १३ हजार २९० कोटी रुपयांची तरतुद महाविकास आघाडी सरकारने केली होती त्यापैकी केवळ ३३ टक्केच निधी आजपर्यंत खर्च झाला आहे. राज्यातील हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ सात आणि आठ टक्के निधी खर्च झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्रजींच्या नागपूर जिल्ह्यात सुध्दा केवळ १५ टक्के निधी खर्च झाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्याचे पालकमंत्री काय करताहेत ? त्यांचे विकासावर लक्ष नाही का ? असे प्रश्न पवार यांनी उपस्थित केले. एकच काम करुन तीन-तीन बिले काढण्याचे प्रताप काही मंडळींनी केले असल्याचा आरोप करत या सरकारला राज्याच्या विकासाचे काहीही देणेघेणे नसल्याचे पवार म्हणाले.
मविआच्या गत पंचसुत्री अर्थसंकल्पाची कॉपी पेस्ट
राज्याच्या विकासासाठी राज्याच्या पंचसूत्रीचा अर्थसंकल्प आम्ही मांडला होता, त्यामुळे मागच्याच अर्थसंकल्पाची चुकीची कॉपी करण्याचा हा प्रयत्न केला आहे. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना खूश करण्यासाठी केवळ महामंडळांच्या नावांची घोषणा केली. मात्र या महामंडळांना किती निधी दिला जाईल हे नमूद न करता निधीची तरतुद असे मोघम सांगण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे नुसता कोरड्या घोषणांचा सुकाळ आहे. राज्याची आर्थिक स्थिती बघता त्या कितीपूर्ण होतील हे सांगता येणार नाही. त्याचबरोबर येत्या एप्रिलमध्ये राज्यातल्या जनतेला वीजदरवाढीचा मोठा झटका महावितरण देणार आहे. समाजातल्या कोणत्याच घटकांना या अर्थसंकल्पातून न्याय मिळणार नसून समाजातल्या प्रत्येक घटकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. अमृत आजपर्यंत कोणी बघितलेले नाही, त्यामुळे या अर्थसंकल्पातल्या कोणत्याच घोषणा पूर्ण होताना कोणालाच दिसणार नसल्याचा चिमटाही अजित पवार यांनी काढला.