तांत्रिक बिघाड झाल्याने १० गावे अंधारात
@maharashtracity
महाड: दर वर्षी पावसाच्या सुरवातीलाच महावितरणच्या वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड होणे हे काय नवीन नाही. अद्याप मान्सूनी पावसाळा खऱ्या अर्थाने सुरू झालेला नाही. गुरुवारी फक्त काही मिनिटे पडलेल्या पावसाने महाड तालुक्यातील १० गावांना झटका दिला. या गावांचा १८ तास वीज पुरवठा (power failure) खंडित झाला होता.
गुरुवारी संध्याकाळी महाड (Mahad) तालुक्यात थोड्या वादळासह रिमझीम पाऊस झाला. या पावसामुळे महाड तालुक्यातील १० गावे अंधारात गेली. काही गावांची वीज तब्बल १० तासाने तर काही गावांची वीज तब्बल १८ तासाने आली. या मुळे परिसरातील नागरिकांमध्ये महावितरण विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
वाहूर फिडरवर ४५०० वीज ग्राहक आहेत तर महाड ग्रामीण भागात २००० वीज ग्राहक आहेत. या विभागात गंधार पाले, साहिल नगर, केंबुर्ली, वाहूर ,दासगाव, वीर, टोळ, सापे, कोकरे, दाभोळ अशी १० गावे आहेत. या गावांसाठी १५०० पोलवरून वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर या पोलवर तारांना स्थीर ठेवण्यासाठी ४५०० पिन इन्सुलेटर आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि हिवाळ्यापूर्वी हे पिन इन्सुलेटर ब्रेक होतात. त्यामुळे या दोन्ही वेळी मोठ्या प्रमाणात वीज खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची वेळीच देखभाल व दुरुस्ती केली गेली तर नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ येणार नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ बोलून दाखवत आहे.
“दर वर्षी पावसाळा सुरू होताच वीज पुरवठा खंडित होण्यास सुरुवात होते. महावितरणकडे अनुभवी कर्मचारी नसल्याने बिघाड लवकर शोधले जात नाही. याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरण अधिकारी तसेच कार्यालय सरळ उत्तर देत नाही.”
- निजाम जलाल ,सामाजिक कार्यकर्ता