विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा घणाघात

By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेचा शुक्रवारी येथे माध्यमांशी बोलताना धिक्कार केला. 

मतमतांतरे असली तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारे कोणाची खासदारकी रद्द करण्याची घटना घडलेली नाही, असे स्पष्ट मतही पवार यांनी व्यक्त केले. 

कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा मुद्दा काँग्रेसचे सदस्य नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यानंतर पवार यांनी विधिमंडळ परिसरातील माध्यमांशी संवाद साधला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली. त्यांनी दिलेल्या शिकवणीत अशी भूमिका बसत नाही असेही पवार यावेळी नमूद केले. अशा घटना व सर्व प्रकार जनता बघत आहे. राज्यकर्त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जायचे असते, या देशाच्या पंरपरेला तिलांजली देण्याचे काम झाल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला. 

इंदिरा गांधी यांच्याबद्दल अशा प्रकारे तत्कालीन सरकारने घेतलेली भूमिका जनतेला पटली नव्हती. ज्या इंदिरा गांधीना आणीबाणीच्या कारणाने १९७७ साली पराभूत केले त्यांनाच १९८० साली प्रचंड बहुमताने देशाच्या पंतप्रधानपदी बसवण्याचे काम देशातील जनतेने लोकशाहीच्या मार्गाने केले. त्यामुळे आताच्या काळात ज्या घटना घडत आहेत ते सर्वसामान्य जनतेला पटणाऱ्या नाहीत, असे स्पष्ट बजावत पवार यांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here