प्रदेश राष्ट्रवादीचा थेट आरोप
By Anant Nalavade
Twitter: @nalavadeanant
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिमा तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र रेल्वे सुरक्षेसंदर्भात कॅगने दिलेल्या अहवालाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ओडिशातील रेल्वे अपघातात तीनशे लोकांना आपला जीव गमवावा लागला, असा थेट आरोप प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सोमवारी येथे केला.
कॅगने आपल्या अहवालात रेल्वे सुरक्षा, ऑडिट आणि तपासणीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत अनेक त्रुटींवर बोट ठेवले आहे. अशी गंभीर निरीक्षणे नोंदवली गेली असताना कॅगच्या अहवालाकडे का दुर्लक्ष केले गेले, हे भाजप सरकारने जनतेला सांगावे असे आव्हानही तपासे यांनी दिले.
मोदींच्या कुशासनात गेल्या ९ वर्षात रेल्वे रुळावरून घसरणे, अपघात, जखमी आणि मृत्यूच्या विक्रमी घटना घडल्या आहेत असा थेट हल्लाबोल करतानाच, रेल्वे मंत्रालयाने अहवालावर तात्काळ कारवाई केली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती. आता तरी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही तपासे यांनी केली.